“तुमच्या बालशाळेमध्ये मुलांच्या व्यायामाची काय सोय आहे? त्यांच्या शरीर विकासाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. नाही का?”
“शरीर विकासाकडे या वयात विशेष लक्ष दिले पाहिजे ही गोष्ट आम्हास पूर्ण संमत असून ती आम्ही नेहमी डोळ्यांसमोर ठेवतो व त्याकरिता व्यायामाची साधने ठेवण्याऐवजी विश्रांतीची साधने ठेवतो व विश्रांती घेण्यास शिकवतो.”
“म्हणजे? मुलांना व्यायाम नकोत असे तुमचे म्हणणे आहे की काय?”
“नव्हे, तसे आमचे म्हणणे नाही. पण मुले स्वाभाविकपणे व्यायाम घेत असतात व कमी पेक्षा जास्त करण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. म्हणून व्यायामासाठी उत्तेजन देण्याची तर जरूर नसते पण त्यास वळण देण्याची, विश्रांती घेण्यास शिकवण्याची जरूर असते.”
“ते कसे करता?”
“वळण असे देतो की ती वाटेल तशी इकडून तिकडे चालत असतात, धावत असतात. तर त्यांना चालण्यासाठी एक फळी व रेषा काढून देतो. बरोबर त्यावरून चालल्यास त्यांना आपल्या स्नायूवर विशेष ताबा मिळवावा लागतो व समतोलपणाही साधावा लागतो.”
“आणि विश्रांती घेण्यास काय शिकवायचे?”
“वा! ते तर फारच आवश्यक आहे.”

बहुतेक मुलांना आपण थकलो आहोत की काय हे कळतच नाही. दुसरे, ती थकली असली आणि स्वस्थ बसली तर जास्तच अस्वस्थ वाटते, घाम येतो, गरमी वाटते, म्हणून शांत बसण्यास शिकवावे लागते व मधून मधून शांत अथवा स्वस्थ बसून विश्रांती घेण्याची सवय लावावी लागते.

“विश्रांती घेण्याचे काही प्रकार शिकवायचे असतात की नुसते विश्रांती घ्या म्हणून सांगायचे?”

“प्रकार असतात. पण सर्व प्रकारात स्नायूंना ढिले सोडणे व मन शांत करणे या दोन गोष्टी आवश्यक असतात. त्या वारंवार दाखवणे व करून घेणे जरुरीचे असते.विश्रांत होण्याची दोन-चार आसने अथवा प्रकार त्यांना शिकवावयास हवेत.
१. पाठ ताठ ठेवून, आसन मांडी घालून, मांडीवर हात ठेवून, डोळे झाकून, शरीराचा कोणताही भाग न हलवता शांत बसणे.
२. कठीण बिछान्यावर अथवा जमिनीवर पाठीवर पाय लांब करून हात बाजूला घेऊन स्वस्थ पडणे. त्यावेळी पाय वगैरे काही हलवत बसायचे नाही.
३. जमिनीवर अथवा घसरणीवर पोटावर घसरणे अथवा सरकणे.
४. पारंब्या अथवा दोरीला लोंबकळणे.
५. पाय लांब करून जमिनीवर बसून आपलेच पाय हळूहळू दाबणे.
६. पाय ताठ लांब होतील अशा झोपळ्यावर बसून झोका घेणे. पाय लोंबकळत ठेवून अथवा उभ्याने नव्हे.

एकंदरीत बालकास दोन प्रकारची विश्रांती हवी असते. (१) पायावर धडाचे वजन फार येऊ नये म्हणून पायांना विश्रांती. (२) ज्ञानतंतू फार उत्तेजित होतात त्यांना मधून मधून शांती देणे.

याशिवाय मुद्दाम जास्त व्यायाम करवणे, चुरशीने जास्त धावायला पळायला लावणे, दाखविण्याकरिता निरनिराळ्या कवायती तयार करून घेणे, आपण त्यांचेबरोबर खेळून त्यास जास्त उत्तेजित करणे, ती खेळतात ते पाहायला बसून, कौतुक करून व शाब्बासकी देऊन जास्त खेळायला लावणे वगैरे तर अतिशय हानिकारक आहेत.

“तर मग मुलांच्या व्यायामाचे बाबतीत काहीच करावयास नको. असेच ना? पण कित्येक मुले आळशी असतात, हातपाय हलवीतच नाहीत. त्यांना तसेच राहू द्यायचे का?

“आपण होऊन मूल खेळत नसले, चळवळ करत नसले की डॉक्टरला दाखवावे. कारण शोधून औषधोपचार करावं. आळशी आहे असे वाटत असल्यास खाणे नियमित करावे व पोट साफ आहे की नाही याकडे लक्ष द्यावे. शरीराचे काही कारण नसल्यास मानसिक कारण आहे किंवा काय ते तपासवे व उपचार करावा.

पूर्ण निरोगी मूल खेळेच पाहिजे, आपण होऊन धावले नाचलेच पाहिजे. त्याकरता काही करावयास नको.

शिक्षण पत्रिका, वर्ष ५, अंक ६, नोव्हेंबर १९३७

(मुले खेळतानाचे चित्र क्वेस्टच्या ‘माझी अंगणवाडी’ पुस्तिकेमधून घेतले आहे.)

Leave a comment

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.