About

ताराबाई मोडक यांचे शिक्षणाबद्दलचे विचार एका ठिकाणी उपलब्ध व्हावेत यासाठी ही वेबसाईट Quality Education Support Trust (QUEST) या संस्थेने पुढाकार घेऊन बनवली आहे. शिक्षणकर्मींना आजही उपयुक्त ठरेल असे बरेचसे साहित्य ताराबाईंनी त्यांच्या कार्यकाळात लिहिले होते. ‘शिक्षण पत्रिका’ या नियतकालिकामध्ये त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले होते. इंटरनेटवर मात्र त्यांनी लिहिलेले हे लेख फारच तुरळक प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसून येते. हे काम सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा उपक्रम.

ताराबाईंनी माँटेसरी शिक्षणपद्धतीचा कायम आग्रह धरला. बालकांचे स्वातंत्र्य, स्वयंस्फूर्तता या तत्त्वांवर आधारित शिक्षणाचा एक नवा दृष्टीकोन त्या जनमानसात रुजवू पाहात होत्या. शिक्षक-शिक्षण आणि पालक प्रबोधन या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले. या सगळ्याच्या मागची त्यांची प्रेरणा ‘बालक’ हीच होती.

या वेबसाइटवर आम्ही ताराबाईंचा एकेक लेख ठराविक कालांतराने प्रकाशित करणार आहोत. वाचकांच्या संग्रही त्यांचे काही लेख, भाषणे, त्यांनी लिहिलेली पत्रे किंवा इतर काही अप्रकाशित साहित्य असेल, तर कृपया ते आमच्याकडे पाठवावे. आम्ही या वेबसाइटवर ते पाठवणाऱ्याच्या नावासहित प्रकाशित करू.

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.